खातेधारकांच्या व्यवहारांना संरक्षण देण्यासाठी स्टेट बँक ऑफ इंडियाने (एसबीआय) एटीएममधून पैसे काढताना ओटीपी (वन टाइम पासवर्ड) टाकणे बंधनकारक केले आहे. येत्या १ जानेवारीपासून याची अंमलबजावणी करण्यात येईल. एटीएम केंद्रांवर होणाऱ्या गैरव्यवहारांना आळा घालण्यासाठी हे पाऊल उचलले असल्याचे बँकेने स्पष्ट केले आहे. यामुळे अधिकृत खातेधारकाशिवाय इतर कोणालाही एटीएममधून पैसे काढता येणार नाहीत.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे, रात्री 8 ते सकाळी 8 च्या दरम्यान 10 हजारांपेक्षा जास्त रुपयांच्या व्यवहारांनाच ओटीपी लागू असणार आहे. दिवसभरात होणाऱ्या व्यवहारांसाठी तसेच 10 हजारांपेक्षा कमी रकमेसाठी ओटीपी टाकण्याची आवश्यकता असणार नाही. तसेच एसबीआयचे खातेधारक जर दुसऱ्या बँकेच्या एटीएममधून पैसे काढत असतील तरी देखील ओटीपी विचारला जाणार नाही. कारण दुसऱ्या बँकांच्या एटीएममधून पैसे काढण्यासाठी आवश्यक असणाऱ्या ‘नॅशनल फिनान्शियल स्विच’ प्रक्रियेत यासंदर्भातील बदल करण्यात आलेले नाहीत.