आर्थिक आराखडा आणि त्याच्या पायऱ्या

१ व्यवसाय आणि वैयक्तिक आर्थिक ध्येयं वेगळी ठेवायला हवीत. जेवढा व्यवसाय वाढवणं गरजेचं आहे, तेवढंच गरजेचं आहे तुमच्या कुटुंबाच्या आर्थिक गरजा भागवणं. जर कुटुंबासाठी हवे तेव्हा आणि लागतील तेवढे पैसे नाही पुरवता आले तर त्या व्यवसायातून नक्की काय साध्य होणार, हे नेहमीच लक्षात असू द्यावे.

२ प्रत्येक वेळी गरज लागली की आपण घरचे पैसे उचलतो आणि उद्योगामध्ये घालतो; परंतु असे करताना कुठे तरी आपली वैयक्तिक आर्थिक परिस्थिती कमकुवत होतेय का- याबाबत जागरूक राहाणं खूप महत्त्वाचं आहे. म्हणायला जरी सोपं वाटलं तरी पाळायला हे फार कठीण आहे. कारण उद्योगामध्ये बुडालेल्यांना दुसरं काही दिसत नसतं. शिवाय एक अजून गोष्ट इथे लक्षात घेणं आहे की, उद्योग हासुद्धा स्वत:च्या पायांवर उभा राहिला पाहिजे. त्याला जर सतत घरातले पैसे लागत असतील, तर काही तरी नक्की चुकतंय आणि ती चूक लवकर सुधारली पाहिजे.

३ उद्योगातून मिळणारा परतावा यावर नेहमीच लक्ष ठेवणं गरजेचं आहे. काही उद्योग भरपूर उलाढाल करतात, परंतु प्रत्यक्ष फायदा मात्र छोटा असतो, तर काही ठिकाणी उलाढाल कमी, पण फायदा जास्त असतो. काही उद्योग सदाबहार असतात तर काहींमध्ये सतत बदल करावे लागतात. काही मोसमी असतात, तर काही बारमाही. काहींना भरपूर भांडवल लागतं, तर काहींना कमी. तेव्हा या सर्व गोष्टींचा विचार करून कधी, किती आणि कसे परतावे सुरक्षित करता येतील यावर नक्की विचार केला पाहिजे.

४ कुठलाही उद्योग फक्त चांगला नफा कमावतो म्हणून यशस्वी आहे, असं म्हणता येत नाही. त्या नफ्यामुळे जर वैयक्तिक परिस्थिती सुधारली आणि बँक बॅलन्स वाढला तरच एवढे खटाटोप केल्याचं चीज झालं असं म्हणता येईल. नाही तर फायदा तर दिसतोय, पण हाताळायला पैसा नाही! असे उद्योग सतत कर्जाच्या डोंगराखाली राहतात किंवा घरच्यासाठी काही नीट देत नाही.

स्वत:चं निवृत्ती नियोजन करताना आपल्या व्यवसायाचं स्वरूप ध्यानात असणं महत्त्वाचं आहे.

६ एका ठरावीक कालावधीनंतर व्यवसाय आणि वैयक्तिक व्यवहार पूर्णपणे वेगळे करून घ्यायला हवे. जसा नोकरीतून पगार मिळतो आणि त्यातून घरच्या गरजा भागवल्या जातात, त्याचप्रमाणे व्यवसायातूनसुद्धा नियमित पैसे बाजूला काढून वैयक्तिक गुंतवणूक झाली पाहिजे.

७ एकाच प्रकारच्या व्यवसायावरची मदार कमी कशी होईल यावर वेळीच लक्ष देणं गरजेचे आहे. म्हणून वैयक्तिक आर्थिक नियोजन तर व्हायलाच हवं, पण त्याही पुढे, इतर उद्योग पर्यायसुद्धा लक्षात घेता आले तर त्याचा फायदा नक्की होईल.

८ व्यवसायाची देणी ही शक्यतो वैयक्तिक पैशातून देण्याची वेळ येऊ नये. अर्थात अडीनडीसाठी असं करणं ठीक आहे, परंतु हे जर वारंवार होत असेल तर पुन्हा एकदा व्यवसायाकडे टीकाकाराच्या दृष्टीने बघणं अत्यंत गरजेचं आहे.

९ कुठलाही व्यवसाय म्हटलं की जोखीम ही आलीच; परंतु या जोखमीचा तुमच्या संपूर्ण आर्थिक स्थितीवर काय आणि किती परिणाम होणार याची तरतूद आर्थिक नियोजनातून करता येऊ शकते.

१० आपल्यानंतर आपला व्यवसाय पुढे कसा जाणार, कोण नेणार, कुटुंबावर त्याची काय जबाबदारी पडेल, या सर्व प्रश्नांची यादी करून त्यावर सखोल विचार करून तोडगा शोधायला हवा. कारण वेळ सांगून येत नाही. असं व्हायला नको की, तुम्ही मेहनतीने उभा केलेला व्यवसाय तुमच्या पश्चात कुटुंबासाठी डोकेदुखी ठरेल.

११ जसं वैयक्तिक आर्थिक नियोजनामध्ये वारसा हक्क नियोजन करणं महत्त्वाचं आहे तसंच ते उद्योगाच्या बाबतीतही महत्त्वाचं आहे. तेव्हा योग्य सल्ला घेऊन याबाबतचे निर्णय वेळेवर घ्या.

१२ नोकरीमधून नियमित मिळकत वगळता इतर फायदेही असतात- निर्वाह निधी, आयुर्विमा, आरोग्य विमा, राहण्याची सोय, इमर्जन्सी कर्ज इत्यादी. परंतु व्यावसायिकांना हे मिळत नाही; परंतु या सर्वाची सोय त्यांनाच करावी लागते. तेव्हा एक लाखाचा पगार आणि एक लाखाचा फायदा तुलनात्मक नाही हे ध्यानात ठेवा.

१३ व्यवसाय ही २४ तासांची आणि ३६५ दिवसांची नोकरी आहे आणि म्हणून त्यातून फायदा हा नोकरीपेक्षा जास्त झालाच पाहिजे. वेळोवेळी आपला व्यवसाय हवा तेवढा फायदा देतोय की नाही हे तपासा आणि योग्य वेळी बदल करा. नोकरी असो की व्यवसाय, आर्थिक नियोजन हे आलंच.

तेव्हा वेळीच योग्य दिशेने पाऊल उचला आणि आपल्या आयुष्यामध्ये दोन्ही बाजूने भरभराटीचा अनुभव घ्या.

अभिप्राय द्या!