निवृत्तीनंतर आर्थिक सुरक्षितता देणाऱ्या राष्ट्रीय पेन्शन योजनेला केंद्र सरकारने आकर्षक केलं आहे. पेन्शन फंडांचे नियमन करणाऱ्या पीएफआरडीएकडून या योजनेत सहभागी वयाची वयोमर्यादा वाढवण्यात आली असून गुंतवणुकीबाबत काही महत्वाच्या सुधारणा करण्यात आल्या आहेत.
नवीन नियमानुसार यापुढे राष्ट्रीय पेन्शन योजनेत व वर्ष ७० पर्यंतची व्यक्ती सहभागी होऊ शकते. सध्याची वयोमर्यादा ६५ असून त्यात नव्या नियमानुसार पाच वर्षांची वाढ करण्यात आली आहे. १८ ते ७० वयोमर्यादतील व्यक्ती एनपीएससाठी पात्र आहे, असं पीएफआरडीएने म्हटलं आहे.
आणखी एक महत्वाचा बदल सरकारने या योजनेत केला आहे. त्यानुसार ६५ वर्षांनंतर एनपीएस गुंतवणूक करणाऱ्यांना तीन वर्षांचा किमान गुंतवणूक कालावधी (लॉकइन) आहे. योजनेतून बाहेर पडण्यासाठी कमाल ७५ वर्ष वय आवश्यक आहे. ग्राहक एकूण रकमेपैकी ६० टक्के रक्कम करमुक्त एकरकमी म्हणून काढू शकतात आणि उर्वरित ४० टक्के रक्कम एन्युइटी खरेदी करण्यासाठी वापरावी लागेल.
नुकताच पीएफआरडीएने अॅसेट अॅलोकेशनच्या नियमांत बदल केला होता. त्यानुसार ६५ वर्षांच्या वयानंतर एनपीएसमध्ये सामील होणाऱ्या सभासदांना इक्विटीमध्ये ५० टक्क्यांपर्यंत गुंतवणूक करण्यास परवानगी दिली आहे. जर गुंतवणूकदारांनी हा पर्याय निवडला नाही तर १५ टक्के शेअर्समध्ये गुंतवणूक केली जाते.