काही दिवसांपूर्वी एक महत्त्वाची गोष्ट बाजारात घडली ज्याचे निरीक्षण साधारण कोणी केलं नसेल आणि ती म्हणजे आतापर्यंतची सर्वाधिक उलाढाल राष्ट्रीय शेअर बाजारात झाली. ती तारीख होती ८ नोव्हेंबर २०२१. साधारण ३६९ कोटी रुपयांचे व्यवहार या दिवशी बाजारात केले गेले. यावरून एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे आणि ती म्हणजे, मोठ्या प्रमाणावर खेळते भांडवल या बाजारात येत आहे. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स १,००,००० होईल आणि निफ्टी २५,००० ते २८,००० असेल हे उगाचच सांगितलं जात नाहीये. त्याहीमागे एक सांख्यिकी डेटा आहे. याचा अभ्यास किंवा निरीक्षण आपण मराठीजन करत नाही. हे मुद्दाम लिहितो आहे, कारण अशी माहिती कोणीही ब्रोकर किंवा सल्लागार सहसा आपल्याला देणार नाही. भारत ही जगासाठी मोठी बाजारपेठ आहे हे जेवढं आपल्याला कळेल तेवढे लवकर आपण गुंतवणूक करण्यासाठी आकृष्ट होऊ. फक्त मुदत ठेव योजनेवर राहायचे किंवा जगायचे दिवस आता गेले. भांडवल बाजार हाच पर्याय काही दिवसांनी राहील असं दिसतंय.
सन २००३ ते २००७ याकाळात जशी शेअर बाजाराची वाटचाल होती तसाच काहीसा कल पुढील २०२१ ते २०२६ या कालावधीत बाजाराचा राहील. हाती आलेली एकदंर माहिती पाहता असंच वाटतं आहे. आपणही अभ्यास करावा आणि आपली गुंतवणूक योजना तयार करावी. बाजार खालीवर होत राहणारच. पण पुढील वाटचाल सुरु होत असताना भांडवल हाताशी असणं खूप महत्त्वाचं आहे.
भांडवली गुंतवणूक करताना आपल्या आर्थिक सल्लागाराची मदत घेऊनच निर्णय घ्यावा. या गुंतवणुकीपासून होणारा नफा किंवा तोटा याची जबाबदारी गुंतवणूकदार म्हणून सर्वस्वी तुमचीच राहणार आहे हे लक्षात असू द्या.