आटपाट नगरात राजाने दवंडी पिटवली . सर्व प्रजेने आपल्या घरचे दुध शंकराच्या देवळात आणावे . शंकराच्या देवळाचा गाभारा दुधाने भरावयाचा आहे .
दुधाचे मोठे मोठे रांजण गाभाऱ्यात रिते झाले ,पण गाभारा काही भरेना . राजा चिंताग्रस्त झाला . एवढ्यात एक आजीबाई छोटासा दुधाचा पेला घेवून गाभाऱ्यात गेल्या , राजा मनात म्हणाला ,याने काय होणार ? पण काय आश्चर्य , गाभारा दुधाने पूर्ण भरला !!!
राजाने विचारले तेव्हा आजीबाई म्हणाल्या ” गोठ्यातले वासरू , दारातले कोकरू, चुलीजवळच मांजर , घरातले बालगोपाल या सर्वांच्या मुखी दुध घालून जे उरले ते देवाला दिले.
आणि म्हणून तेच देवाला भावले .!!
तसेच
21 एप्रिल 1996 रोजी निफ्टीचा निर्देशांक एक हजार होता. 2007 मध्ये तो पाच हजारांवर गेला आणि 2014 नंतर तो अक्षरशः उड्डाणे घेत आता दहा हजारांच्या पातळीला जाऊन धडकला आहे. म्हणजेच तीन वर्षांत तीन हजारांची झेप दिसून येते; पण हा उंच झोका तसाच राहील,. या भ्रमात राहणे सर्वसामान्य गुंतवणूकदारांसाठी मात्र धोक्याचे ठरू शकते. तेजीचा वारू दौडत असताना त्यावर स्वार होण्याच्या प्रयत्नात खाली पडण्याचा, खरचटण्याचाही धोका असतो. तो नीट समजावून घेत, दीर्घकाळाचा विचार करून सावधपणे गुंतवणूक करणे आवश्यक आहे. कारण शेअर बाजारीतल वाढ ही पुढच्या परिस्थितीचा आधीच अंदाज घेऊन झालेली वाढ असते. सगळ्या गोष्टी अपेक्षिल्यानुसार घडतील, असे छातीठोकपणे सांगता येत नाही. मात्र या गुंतवणूक पर्यायापासून फटकून दूर राहाणे हेदेखील शहाणपणाचे नाही.
अशा उंच बाजारात स्वार होताना आजीबाईने जसा रांजणभर दुध गाभाऱ्यात न ओतता योग्य निर्णय घेवून पेलाभर दुध ओतून गाभारा भरण्याचे समाधान मिळविले तसेच आपणही स्वतःचा अभ्यास, स्वतःचा विचार यांचे महत्त्व ओळखण्याची आज नितांत गरज आहे.