गेल्याच आठवड्यात भारतीय काॅर्पोरेट जगतातल्या एका दाम्पत्याने आपली निम्मी मालमत्ता (कोट्यवधीची) समाजाला परत करण्याची शपथ वाहिली. नंदन निलेकणी, इन्फोसिसच्या संस्थापक सदस्यांपैकी एक, जे नुकतेच इन्फोसिसच्या कसोटीच्या वेळी नॉन एक्झिक्युटिव्ह चेअरमन म्हणून इन्फोसिसमध्ये परत आले. त्यांनी आणि त्यांच्या पत्नी रोहिणी हे ‘देतं व्हा!’ व्रत स्वीकारत बिल गेटस् आणि वॉरन बफे यांच्या दिंडीत सामील झाले. जगातल्या २१ देशांमधील १७१ दानशूर कर्णांच्या या यादीत भारतातील विप्रोचे अझीम प्रेमजी, बायोकॉनच्या किरण मुजुमदार-शॉ, शोभा डेव्हलपरचे पीएनसी मेनन, यानंतर निलेकणी दाम्पत्याचा चौथा क्रमांक येतो.
कदाचित यातून स्फूर्ती घेऊन भारती एअरटेलच्या मित्तल कुटुंबीयांनीही स्वतःची ७००० कोटींची मिळकत समाजाच्या कल्याणासाठी सुपूर्द केली आहे.
या सर्वांच्या प्रति आपण नतमस्तक झालं पाहिजे आणि आपापल्या परीनं भले खारीचा वाटा असेल, उचलला पाहिजे! आणि समाजाकडून आलेलं, समाजाला परत करण्याची वृत्ती ठेवली पाहिजे.