आजच्या युगात जॉब सिक्युरिटीची गॅरंटी कोणीच घेऊ शकत नाही. अलिकडेच चेन्नई येथील नोकिया कंपनीने आपले युनिट बंद केल्याने शेकडो जण बेरोजगार झालेत. त्यामुळे अशी स्थिती उद‍्भवल्यास सर्वांत मोठा फटका हा आर्थिक आघाडीवरच बसतो. त्यामुळे व्यक्ती कितीही कुशल असली तरी तिला नवी नोकरी मिळविण्यासाठी काही वेळ जाऊ द्यावा लागू शकतो. या काळासाठी आपल्या आर्थिक गणिताची जुळवणी करणे फारच आवश्यक असते. याबाबत आपल्या कुटुंबीयांनाही विश्वासात घेऊन काही पावले उचलणे सहज शक्य आहे, त्याबाबत…

इमर्जन्सी फंड

‘तहान लागल्यावर विहीर खोदण्यात’ काहीच अर्थ नसतो. त्यामुळे अचानक जॉब गेल्याची परिस्थिती उद्‍भवण्याची शक्यता असो वा नसो आपला व कुटुंबाचा सहा महिन्यांचा खर्च भागेल एवढा इमर्जन्सी फंड तयार करून ठेवणे श्रेयस्कर ठरते. त्यासाठी सध्याच्या नोकरीकाळात थोडीथोडी रक्कम जमा केल्यास हे सहज शक्य आहे. थेंबे थेंबे तळे साचे ही म्हण येथे लागू होते.

आपण नोकरी काळात म्युच्युअल फंड, मुदत ठेवी आदी गुंतवणूक योजना किंवा सोने, चांदी, स्थावर मालमत्ता यांच्यात गुंवतणूक करीत असतो. ठराविक महिन्यात आपल्या गुंतवणुकीचा आढावा हा आपण नियमितपणेच घ्यायला हवा पण नोकरी गेल्यानंतर त्यात अधिक सतर्कता दाखविणे गरजेचे आहे. आपण दहमहा एसआयपीच्या माध्यमातून म्युच्युअल फंडात गुंतवणूक करीत असू तर ती बंद करण्याचा पर्यायही आपल्यापुढे असतो. तसेच त्यातून आवश्यक रक्कम काढण्याचीही सोय असते. त्यामुळे तातडीची कर्जे फेडण्यासाठीही याचा वापर होऊ शकतो.
*कर्जाचे हप्ते सांभाळताना…

फेरआखणी

कर्जफेडीचा कालावधी वाढविता येऊ शकतो. त्यामुळे ईएमआय आपोआप कमी होईल.

फेररचना

बँकेला कर्जाची फेररचना करण्याची विनंती तुम्ही करू शकता. कर्जात सवलत मिळविण्याची संधीही यातून मिळू शकते.

आश्वासन

सध्या नोकरी गेल्यामुळे तुम्ही कर्जाचे हप्ते फेडू शकत नसाल तर तसे बँकेला कळवा व भविष्यात मी नक्की कर्ज फेडणार आहे, असे आश्वासनही देऊ शकता. यावर योग्य निर्णय बँकच घेते.

अभिप्राय द्या!