गुंतवणुकीसाठी बाजारातील योग्य स्थिती
दीर्घ कालावधीसाठी म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक केल्यास परतावा चांगला मिळतो. दीर्घकालीन कालावधीचा विचार केल्यास बाजारातील परिस्थितीचा विचार करण्याची गरज नाही. कारण कुठल्याही योजनेचे फंड व्यवस्थापक हे अनुभवी असतात. पैशांचं योग्य नियोजन करण्यासाठी संपूर्ण टीम कार्यरत असते. त्यामुळे ते योग्य निर्णय घेण्यास समर्थ असतात. विशेषतः एसआयपी मध्ये तर बाजारातील स्थितीचा जास्त विचार करण्याची काहीच गरज नाही. कारण आपण दरमहा किंवा ठराविक टप्प्याने गुंतवणूक करत असल्याने घसरलेल्या बाजारात जास्त युनिट्स मिळून फायदाच होतो. मात्र, जर तुम्ही एकरकमी गुंतवणूक करणार असाल तर बाजारामध्ये मिळणाऱ्या ‘करेक्शन’ चा फायदा घेऊन गुंतवणूक केलेली योग्य.

जुनी की नवी योजना
बऱ्याच गुंतवणूकदरांचा कल हा नवीन योजनांमध्ये गुंतवणूक करण्याकडे असतो. सामान्यतः ठराविक कालावधीमध्ये गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी नवीन योजना आणल्या जातात. परंतु त्या किती यशस्वी होतील याची कुठलीही शाश्वती नसते. तुलनेत जुन्या योजनांच्या कामगिरीचा अहवाल उपलब्ध असल्याने त्या योजनेची एकंदरीत परतावा, त्याची बाजारातील किंमत इत्यादी गोष्टींचं आकलन होण्यास मदत होते. बाजारातील चढ उताराच्या चक्रातून या योजना गेल्या असल्यानं त्यांची जोखीम क्षमता न परतावा याचा प्रत्यक्ष परिणाम पाहून अशा योजना गुंतवणूक करण्यास आश्वासक वाटतात.

वयोमर्यादा
वयाच्या पंचविशीत किंवा पहिल्या नोकरीच्या पहिल्या पगारापासून केलेली गुंतवणूक ही नेहमीच उत्तम असते हे वादातीत आहे. अगदी ५०० रुपयांपासून सुरु केलेली एसआयपी देखील दीर्घकाळामध्ये खूप फायदेशीर आणि चांगली परतावा देणारी ठरते. तसेच तुम्ही टप्प्याटप्प्याने जसा तुमचा पगार किंवा उत्पन्न वाढेल त्याप्रमाणे तुमची गुंतवणूक वाढवू देखील शकता. परंतु, गुंतवणूक करण्यास ठराविक असच वय असलं पाहिजे असं नाही. उशिरा सुरु केलेली गुंतवणूक देखील मुलांच्या उच्च शिक्षण, लग्न किंवा रिटायरमेंट साठी कमी येईल. अगदी रिटायरमेंट मध्ये केलेली म्युच्यअल फंडातील गुंतवणूकसुद्धा तुम्हाला दर महिन्याला लागणाऱ्या खर्चाला कामी येऊ शकते.

अभिप्राय द्या!